बचती अभावी केली हमेशा घाट्याच्या सौद्यात शेती. सांगा कशी सापडणार नाही कर्जाच्या विळख्यात शेती. शेतात माझ्या थोडा तरी या पैशाचा पाऊस पाडा, असतो करत मी वाजिब दराच्या दुष्काळी पट्ट्यात शेती. लावून चारा करतात जैसा न्यौछावर बकरा बळीचा, लुटतात अगदी तैसीच बिल्कुल मदतीच्या बदल्यात शेती. बैलाप्रमाणे जोखंड नसले मानेवर माझ्या तरीपण, आहे करत मी या शासनाच्या कानूनी फास्यात शेती. देशात एके काळात होती शेती ही सर्वात उत्तम, पण आज ठरली दर्जात दुय्यम साऱ्याची याच्यात शेती. 'रविपाल ' आहे कल्याणकारी लोकांचे गणराज्य हे तर, देशोधडीला का लागली ही लोकांच्या राज्यात शेती ? गज़लकार : डॉ. रविपाल भारशंकर (९३ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे कवीकट्टा या मंचावर सादरीकरणाकरीता निवड झालेली गझल. दि. १२ जानेवारी २०२०)
Comments
Post a Comment