हा एक फक्त दिधला उपहार धोरणाने. बे-भाव कृषक मेला सरकार धोरणाने. जर लोक हे असेची मरणार धोरणाने, होणार काय सांगा उद्धार धोरणाने? गावात आज उरली समशान घाट शांती, आधीच अंत्य केला संस्कार धोरणाने. फुकटात शेत तारण ठेऊन पण जहाले, असल्यास सांग अजुनी दरकार धोरणाणे? अजिबात हीन ठरलो शेतीत राबताना, याहून काय केला सत्कार धोरणाने? लक्षात आज आले म्हणतात कृष कशाला, साक्षात कृश बनवले बीमार धोरणाने. जोडून दे म्हणावे एकेक वीट आता, तडकून पार गेले घरदार धोरणाने. आजार लाइलाजी आहेत धोरणे ही, होणार काय तो या उपचार धोरणाने. कल्याण क्षेम माझे बस हेच खूप झाले, आता न कर अजोणी उपकार धोरणाने. 'रविपाल' कर अशा या धिक्कार धोरणांचा, येतात हेच आता उद्गार धोरणाने. गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर (विश्वस्तरीय लेखनस्पर्धा - २०१८, गझल विभागात प्रथम पुरस्कार प्राप्त गझल. पैठण जि. औरंगाबाद, संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह येथे दि. ०३/०२/२०१८, ला ५ व्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन मंचावर पुरस्कार प्राप्त.)
गझलेच्या संपूर्ण इतिहासात प्रथमच गणभंग न करता वृत्त वजनाचा वापर !