Skip to main content

गझल : २२. वृत्त : आनंदकंद.

हा एक फक्त दिधला उपहार धोरणाने.
बे-भाव कृषक मेला सरकार धोरणाने.

जर लोक हे असेची मरणार धोरणाने,
होणार काय सांगा उद्धार धोरणाने?

गावात आज उरली समशान घाट शांती,
आधीच अंत्य केला संस्कार धोरणाने.

फुकटात शेत तारण ठेऊन पण जहाले,
असल्यास सांग अजुनी दरकार धोरणाणे?

अजिबात हीन ठरलो शेतीत राबताना,
याहून काय केला सत्कार धोरणाने?

लक्षात आज आले म्हणतात कृष कशाला,
साक्षात कृश बनवले बीमार धोरणाने.

जोडून दे म्हणावे एकेक वीट आता,
तडकून पार गेले घरदार धोरणाने.

आजार लाइलाजी आहेत धोरणे ही,
होणार काय तो या उपचार धोरणाने.

कल्याण क्षेम माझे बस हेच खूप झाले,
आता न कर अजोणी उपकार धोरणाने.

'रविपाल' कर अशा या धिक्कार धोरणांचा,
येतात हेच आता उद्गार धोरणाने.

गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर

(विश्वस्तरीय लेखनस्पर्धा - २०१८, गझल विभागात प्रथम पुरस्कार प्राप्त गझल. पैठण जि. औरंगाबाद, संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह येथे दि. ०३/०२/२०१८, ला ५ व्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन मंचावर पुरस्कार प्राप्त.)

Comments

Popular posts from this blog

गझल : १६. वृत्त : आनंदकंद

जाणीव हीच जर का नसणार माणसाला. माणूस कोण आहे म्हणणार माणसाला? दुःखात माणसाचे आयुष्य सर्व गेले, आनंद काय सांगा असणार माणसाला. माणूस जोवरी हा भगवान होत नाही, संदर्भ माणसाचा हसणार माणसाला. हे लोक फार मोठ्या संख्येत वाढले जे, नक्कीच मार याचा बसणार माणसाला. 'रविपाल' मीपणाचे उपटून दात घे हे, माणूस पण किती तू डसणार माणसाला! गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर

गझल : २१. वृत्त : मंजुघोषा

ऐक माझी ही विनंती आज देवा. कोण आहे मी मला हे सांग देवा. छंद काही बोलण्याचा सुटत नाही, काय असते सांग ना रे मौन देवा. पाहतो 'रविपाल' आहे सर्वकाही, पण तयाला होत नाही ज्ञान देवा.

गज़ल ६. वृत्त : स्वानंदसम्राट + शेतकरी (गागालगागा गागालगागा) + (गागागा गागालगागा) ९३ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन २०२० उस्मानाबाद येथे सादरीकरणाकरीता निवड झालेली गझल

बचती अभावी केली हमेशा घाट्याच्या सौद्यात शेती. सांगा कशी सापडणार नाही कर्जाच्या विळख्यात शेती. शेतात माझ्या थोडा तरी या पैशाचा पाऊस पाडा, असतो करत मी वाजिब दराच्या दुष्काळी पट्ट्यात शेती. लावून चारा करतात जैसा न्यौछावर बकरा बळीचा, लुटतात अगदी तैसीच बिल्कुल मदतीच्या बदल्यात शेती. बैलाप्रमाणे जोखंड नसले मानेवर माझ्या तरीपण, आहे करत मी या शासनाच्या कानूनी फास्यात शेती. देशात एके काळात होती शेती ही सर्वात उत्तम, पण आज ठरली दर्जात दुय्यम साऱ्याची याच्यात शेती. 'रविपाल ' आहे कल्याणकारी लोकांचे गणराज्य हे तर, देशोधडीला का लागली ही लोकांच्या राज्यात शेती ? गज़लकार : डॉ. रविपाल भारशंकर (९३ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे कवीकट्टा या मंचावर सादरीकरणाकरीता निवड झालेली गझल. दि. १२ जानेवारी २०२०)