आधुनिक या भारताचा रचयिता जयभीम आहे. अन पुरातन मान्यतांचा खातमा जयभीम आहे. दूर आता व्हा न अडवा या भिमाच्या लेकरांना, बा- प्रयोजन चालला हा कारवा जयभीम आहे. देत नाही मुल्य समता त्यामुळे तर उलटपक्षी, हा उरावर विषमतेच्या वेंगला जयभीम आहे. यातणेवर मात केली पण न केली देश दुफळी, देशप्रेमी एकतेचा दाखला जयभीम आहे. वाचवा ही राज्यघटना आपल्याला लाभलेली, हीच आता हाक आम्हा देत हा जयभीम आहे. कोणत्या हो काढल्या या गगणचुंबी दगड मुर्त्या, महत किर्ती पाहिली तर आसमा जयभीम आहे. बात ही 'रविपाल' अपुल्या तू मनावर बिंबवावी, शिक्षणाणे धन्य व्हावे हा धडा जयभीम आहे. गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर
हा एक फक्त दिधला उपहार धोरणाने. बे-भाव कृषक मेला सरकार धोरणाने. जर लोक हे असेची मरणार धोरणाने, होणार काय सांगा उद्धार धोरणाने? गावात आज उरली समशान घाट शांती, आधीच अंत्य केला संस्कार धोरणाने. फुकटात शेत तारण ठेऊन पण जहाले, असल्यास सांग अजुनी दरकार धोरणाणे? अजिबात हीन ठरलो शेतीत राबताना, याहून काय केला सत्कार धोरणाने? लक्षात आज आले म्हणतात कृष कशाला, साक्षात कृश बनवले बीमार धोरणाने. जोडून दे म्हणावे एकेक वीट आता, तडकून पार गेले घरदार धोरणाने. आजार लाइलाजी आहेत धोरणे ही, होणार काय तो या उपचार धोरणाने. कल्याण क्षेम माझे बस हेच खूप झाले, आता न कर अजोणी उपकार धोरणाने. 'रविपाल' कर अशा या धिक्कार धोरणांचा, येतात हेच आता उद्गार धोरणाने. गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर (विश्वस्तरीय लेखनस्पर्धा - २०१८, गझल विभागात प्रथम पुरस्कार प्राप्त गझल. पैठण जि. औरंगाबाद, संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह येथे दि. ०३/०२/२०१८, ला ५ व्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन मंचावर पुरस्कार प्राप्त.)